कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.२० – कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधान परिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ऍड.परब,शशिकांत शिंदे,अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र,मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते आणि ते येथे शांततेने राहतात.उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तमपणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात.मात्र अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते,असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही.या आधारावर भेदभाव मान्य नाही. अश्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजे,आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार,असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top