कार्तिकी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे
दि.06 नोव्हेंबर पासून प्लॉट नोंदणी सुरु
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४ :- कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा होत आहे.कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉटस भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणाऱ्या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, दि.06 नोव्हेंबर पासून प्लॉट नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. संबंधितांनी आगाऊ प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.

कार्तिकी यात्रेला येणाऱ्या पालख्या, दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय,अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण,वीज कनेक्शन,प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी एकूण 497 प्लॉट्स असून त्यापैकी वापरायोग्य 450 प्लॉटस आहेत.हे प्लॉट्स भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात.या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते. येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांची सेक्टर मॅनेजर म्हणून म्हणून नियुक्ती केली आहे. भाविकांना प्लॉटस वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे अधिनस्त कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत.
दिंडी, पालखी समवेत येणाऱ्या भाविकांना भक्तीसागर 65 एकर येथे प्लॉट्सचे वाटप करण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्या अगोदर दिंडी, पालखीतील भाविकांने प्लॉटसाठी मागणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे.
नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे मो.क्र.9767248210 तसेच सहाय्यक बी.ए.वागज मो.क्र. 7756012578 व प्रमोद खंडागळे मो.क्र.9657290403 यांच्याकडे यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.