उंदरगाव येथे पहिल्यांदाच खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/२०२४- अभिजीत धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आपला संपर्क वाढवत आहेत.

विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजीत धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उंदरगाव येथील अभिजीत पाटील यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले होते .सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजु यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हेतू सफल झाला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाऊसाहेब महाडिक-देशमुख, ऋषिकेश तांबिले, उपसरपंच समाधान मस्के, संजय तांबिले, आबासाहेब साठे, नंदकिशोर आरे,मगन नाईकवारे, सुधीर लवटे, सुरज कांबळे, वाय.जी.भोसले, ग्रामपंचायत सदस्य केवड ,अमोल धर्मे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

माढा मतदारसंघ कायम राजकारणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत असतो मात्र विकासाच्याबाबतीत माढा तालुका अनेक कोस दूर असल्याचे जाणवत आहे. येथील महिला तसेच हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण कायम प्रयत्न करणार आहोत. आज खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून हजारो माय-माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा होते.येथील माता-भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद देत खेळांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो – अभिजीत पाटील, चेअरमन- श्री विठ्ठल सह.साखर कारखाना