अजितदादांवर टीका करण्याची महिबूब शेख यांची पात्रता नाही-श्रीकांत शिंदे
स्वतःचे प्रदेशाध्यक्षपद वाचविण्यासाठीच अजितदादांवर टीकेचा केविलवाणा प्रयत्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०८/२०२४- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली.आता विधानसभा निवडणूकीचे वेध सर्वांना लागलेले असताना शरदचंद्र पवार यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे. ज्याने काकाचे ऐकले नाही तो पुतण्या लोकसभेत गेला असे म्हणत गुलाबी कलरवरून देखील अजितदादांवर टीका केली असून विधानसभेला अजितदादांची अवस्था तेलंगणाच्या केसीआर यांच्याप्रमाणे होईल अशी टीका केेली आहे.
या टीकेला आता अजित पवार यांचे समर्थक व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलेले आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देवून आपण शिवसूराज्य यात्रा काढत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे उगाच गर्दी समोर दिसते म्हणून स्वतः चे महत्व वाढवण्यासाठी टीका करायची हे समजायला मार्ग नाही. अजित पवार यांच्यावर टीका करण्याएवढी महिबूब शेख यांची पात्रता नाही त्यांची राजकीय उंचीदेखील तेवढी नाही.
त्यांना पद सोडू वाटत नाही त्यामुळे वरिष्ठांना खूष करण्यासाठी दुसऱ्या नेत्याचे ऐकून अजित पवार यांच्यावर टीका करण्याचे काम महिबूब शेख यांनी केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांना स्वत: पुढे येवून अजितदादांवर टीका करण्याचे धाडस नसल्याने महिबूब शेख यांच्यासारख्या स्वत:च्या बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघात ताकद नसलेल्या नेत्याला पुढे करून टीका करत आहेत.
आपण विकासपुरुष असलेल्या अजित पवारांवर बोलताना जरा विचार करून बोलावे कारण आपल्या नेत्यांचे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात हे न समजण्याइतके राजकारणात कोणी लहान राहिले नाही.अजितदादांची के चंद्रशेखर राव यांच्यासारखी परिस्थिती होईल यावर भविष्यवाणी करण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष पदावरून एकदा पायउतार झाल्यानंतर आपण आपला राजकीय प्रवास काय असेल याचा विचार अन् अभ्यास केला तर बरे होईल.अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मात्र झाकली मूठ सव्वा लाखाची असल्याने ती झाकलेली राहू द्या असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी खडेबोल सुनावले आहेत. अजित पवारांवर टीका करून आपण जरूर काही नेत्यांच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत असाल पण शेवटी काका आणि पुतण्या यांचे राजकारण तुम्हाला आत्ताच कळणार नाही.योग्य वेळी योग्य निशाणा साधण्याची किमया अजितदादांमध्ये आहे एकदा आपण प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय स्थान आहे हे समजून येईल,अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी महिबूब शेख यांच्यावर केली आहे.