कोरोना काळातील अडचणींमधून बँकेच्या नवनियुक्त संचालकांनी वसुली कामकाज पाहात थकबाकी कमी करण्यात यश मिळविले-मा.आमदार प्रशांत परिचारक
शासनाच्या व्याज परतावा योजना कर्जाचा लाभ घ्यावा-बँकेचे चेअरमन सतीश मुळे
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर अर्बन बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रू.38.42 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी 113 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या व्याज परतावा योजना कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

पंढरपूर अर्बन बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या कर्मयोगी सभागृह शाखा नवीपेठ पंढरपूर येथे गुरूवार दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख सोलापूर जिल्ह्याचे मा.आ. प्रशांत परिचारक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत सभासदांचे प्रशिक्षण पार पडले.

प्रास्ताविक बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी केले.प्रास्ताविका मध्ये चेअरमन सतीश मुळे म्हणाले की,प्रधान कार्यालय व 30 शाखासह कार्यरत आपल्या बँकेच्या आर्थिक वर्ष मार्च 2025 अखेर ठेवी रू.1391.47 कोटी, कर्जे रू.916.24 कोटी असून एकूण रू.2307. 71 कोटी इतका मिश्र व्यवसाय झाला असून तरतूदी वजा जाता निव्वळ नफा रू 2. 20 कोटी झाला आहे.सभासदांच्या,ग्राहकांच्या विश्वासावरच बँक व्यवसायवृध्दी करीत आहे. 2024-25 या अहवाल सालात वैधानिक लेखापरिक्षक यांनी तपासणी केली असून बँकेचा सीआरएआर हा 13.87% इतका तर मार्चच्या तुलनेत जून अखेर थकबाकी प्रमाण 3.33% पर्यंत खाली आणणेत बँकेला यश प्राप्त झाले आहे.बँकेने अंतर्गत लेखापरिक्षण आणखी कडक केले आहे. कर्ज योजनांना 8.50% पासून व्याजदर असून त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन केले.
सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरने लहान-मोठे व्यवसायिक,व्यापारी व उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध व्याज परतावा कर्ज योजना ज्यामध्ये आण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गिय महामंडळ, तसेच आई, अमृत अशा विविध समाजामधील व्यावसायिक बांधवाच्या व्यवसायवृध्दीसाठी व्याज परतावा योजनाव्दारे बँकेमार्फत कर्ज वाटप करत आहे.यासाठी बँक शासनाकडून व्याज परतावा मिळतो तितकेच व्याजाने बँक कर्ज वाटप करीत आहे.यामध्ये एकही कर्ज थकीत गेले नसून शासना मार्फत नियमीत परतावा कर्जदारांना मिळत आहे असेही यावेळी बोलताना ते म्हणाले.यावेळी लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

बँकेचे कुटूंबप्रमुख मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी कोरोना काळातील अडचणींमधून बँकेचे नवनियुक्त संचालकांनी वसुली कामकाज पाहात आज थकबाकी कमी करण्यात यश मिळविले असून लाभांशासाठी रिझर्व्ह बँकेकडे बँकेने प्रस्ताव दाखल केला असून मान्यता आल्यावर लाभांश वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी केले.त्यावेळी डॉ.अनिल जोशी,सुभाष भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली.त्यांनीही बँकेचे कामकाज समाधानकारक असल्याचे नमूद केले.बँकेचे व्हाईस चेअरमन सौ.माधुरीताई जोशी यांच्या पसायदानाने सभेची सांगता झाली.
यावेळी बँकेचे संचालक राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, ऋषिकेश उत्पात, व्यंकटेश कौलवार,डॉ.संगिता पाटील, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, अतुल कौलवार, प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे, शुभम लाड तसेच बँकेचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
