हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०२/२०२५- पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील करकंब ता. पंढरपूर येथे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी माढा चे आमदार अभिजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत,मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे,भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत,पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी, ज्येष्ठ नेते नानासाहेब कदम यांच्यासह पंढरपूर शहरातील आजी-माजी नगरसेवक व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विठुरायाची पावनभूमी पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मुंबई पुण्याच्या धर्तीवर टेंभुर्णी-पुणे रोड करकंब ता.पंढरपूर येथे पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची निर्मिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून धोत्रे परिवाराच्यावतीने करण्यात आली आहे.
हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची १ लाख ४ हजार स्क्वेअर फुट जागेत निर्मिती करण्यात आली आहे.यामध्ये ५० रूम, तीन हजार स्क्वेअर फुटचा प्रशस्त हॉल,पंचवीस हजार स्क्वेअर फुट लॉन गार्डन,स्विमिंग पूल, पार्किंगची सोय करण्यात आली आहे.याच ठिकाणी हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे.यामध्ये पंचतारांकित हॉटेल प्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत.

याद्वारे १०० तरुणांना रोजगार मिळणार आहे
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजीक असलेल्या पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंट भाविकांनी नागरिकांसाठी खुले झाले आहे.

श्रीकृष्ण आले सुदामाच्या भेटीला
एक नेता एक झेंडा एक पक्ष हे तत्व बाळगून काम करणारे महाविद्यालयीन जीवनापासून राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी उभारलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले.यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीला आले आहेत असे उद्गार काढले.माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला बळ देण्याचेच काम राज साहेब ठाकरे यांनी केल्याच्या भावना व्यक्त केल्या.