आमदार अभिजीत पाटील यांचा मतदार संघातील रेल्वेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार
आमदार पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक
अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी
मोडनिंब कार्गो टर्मिनल,रेल्वे उड्डाणपूल,पंढरपूर-मुंबई दररोज रेल्वेची सुविधा,माढा रेल्वे सुशोभीकरण याचबरोबर सांगोला येथे कृषी रेल सुरू करण्याची आ.अभिजीत पाटील यांनी केली मागणी

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील हे विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड येथे छत्रपतींच्या गादी समोर नतमस्तक झाले होते.यावेळी त्यांनी माढा मतदार संघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींचे स्मारकाने होणार असल्याचे जाहीर करून माढा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प केला होता.
अल्पावधीतच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखले जाणारे अभिजीत पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक रेल्वे अधिकाऱ्यां सोबत झाली.मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांच्या कुर्डूवाडी येथील वार्षिक स्टेशन इन्स्पेक्शन करण्याच्या निमित्ताने आगमन झाले होते.त्यावेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन माढा मतदार संघातील विविध ठिकाणी रेल्वे सुविधांबाबत सविस्तर चर्चा करून जनहिताच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या.

यावेळी सकारात्मक चर्चा झाली त्यातील महत्त्वपूर्ण मुद्दे :
१) मोडनिंब येथे कार्गो टर्मिनलबाबत सविस्तर चर्चा झाली. अंतिम टप्प्यातील प्रक्रिया वेगाने सुरू आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल कमी वेळेत आणि कमी खर्चात बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य होणार आहे.
२) माढा वडशिंगे महातपूर उड्डाणपुलाबाबत मागणी केली.त्यातील दोन पूल बांधणी बाबत मान्यता मिळाली असून व एकाचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
३) माढा रेल्वे सुशोभीकरण करण्याबाबत व स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी,प्रतीक्षालय (वेटिंग रूम) अशा सर्व सुविधांच्याबाबत मागण्या करण्यात आल्या.
४) पंढरपूर – मुंबई आठवड्यातून तीन वेळा रेल्वे आहे,ती दररोज सुरू करावी अशी मागणी केली. प्रत्येक शनिवार रविवार मुंबई ते पंढरपूर -टू टायर-थ्री टायर डबे वाढवावेत, अशी मागणी करण्यात आली.

५) माढा रेल्वे स्टेशनवर कोरोना काळाच्या आधी सर्व रेल्वे गाड्या थांबत होत्या, परंतु आता फक्त दोनच गाड्या थांबतात. पूर्वीप्रमाणे सर्व गाड्या थांबल्यास सर्व प्रवाशांची सोय होईल.याबाबत सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात आली.
६) कोरोना काळाच्या आधी सांगोला येथे कृषी रेल सुरू होती ती आता बंद आहे ती पुन्हा सुरू करावी अशीही मागणी करण्यात आली.
७) रेल्वे परिसरातील सर्व जागा विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
चर्चा सविस्तर झाली असून सर्वच मागण्यांबाबत ते सकारात्मक आहेत. त्यांच्या सहकार्याने प्रवाशांना आणि विशेष करून शेतकरी बांधवांना यांचा विशेष लाभ होणार आहे.कार्य पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील असे माढा मतदारसंघाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी या चर्चेनंतर प्रतिक्रिया दिली.

