शेतकऱ्यांनी ओळखपत्र क्रमांकासाठी ॲग्रीस्टॅक मोबाईल ॲपवर नोंदणी करावी-जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ
जालना,जिमाका :- राज्यात दि.1 डिसेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे.शासन निर्णयानूसार शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहीम स्वरुपात राबविण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्लेस्टोअर वरुन ॲप डाऊनलोड करुन शेतकरी ओळखपत्रासाठी आधार क्रमांकाची ॲग्रीस्टॅक मोबाईल ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

ॲग्रीस्टॅक या योजनेत शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांचे नाव,त्याच्या जमिनीची माहिती व आधार क्रमांक जोडला जाणार आहे. यातुन शेतकऱ्यांची संख्या,त्यांच्याकडील जमिनींचे नेमके क्षेत्र कळू शकणार आहे. त्यासोबतच अधिकार अभिलेखांनाही आधार जोडणी करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव भूमि अभिलेख विभागाने केंद्र सरकारकडे दिला होता, त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. राईटस ऑफ रेकॉर्डमध्ये एखादा शेतकरी जमिनीचा मालक असल्याची ओळख राज्य सरकारला पटवून देणार आहे. त्यासाठी तलाठ्याकडे समक्ष जावून जमिनीची नोंद केली जाईल. जमिनीचा मालक हा तोच शेतकरी असल्याची खात्री तलाठी हे कोतवालाकडून करतील. नमुद शेतकऱ्यांनी नाव व त्यांची शेती या डेटाबेसचा वापर करण्यात येईल. शेतकऱ्यांची ओळख पटविणारा आधार क्रमांक हा त्याच्या मालकीच्या शेताशी जोडला जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येईल.
जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत होणाऱ्या व्यवहारांमध्ये संमती असल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांची पडताळणी करता येत नव्हती. त्यामुळे अनेक गैरव्यवहार होत होते. मात्र आता अधिकार अभिलेखाला आधार जोडल्याने अशा व्यवहाराची माहिती संबंधित शेतकऱ्याला असावी यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून एसएमएसद्वारे ओटीपी दिला जाईल.हा ओटीपी दिल्या नंतरच व्यवहार पुर्ण होणार आहे.शेतकरी ओळखपत्रा सह अधिकार अभिलेखाला आधार जोडणीचे काम तलाठी करणार आहेत असा या योजनेचा फायदा होईल. आगामी तीन महिन्यात ॲग्रीस्टॅक प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. असेही ॲग्रीस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी कळविले आहे.