संविधानिक मूल्ये हीच आपली ताकद त्यामुळे लहानपणा पासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे – माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शैक्षणिक आणि सामाजिक कामात शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे काम मोठे – ज्येष्ठ नेते शरद पवार
भारतीय जैन संघटनेकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले व अनुभवही मिळाला-सिने अभिनेता आमिर खान

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज :सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज आहे. संविधानिक मूल्ये हीच आपली ताकद आहे.त्यामुळे लहान पणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे.एखादी व्यक्ती मोठी झाल्यानंतर समाजात त्याच्यासाठीची व्यवस्था तयार केली जाते. कधी सरकार तर कधी समाज ही व्यवस्था तयार करत असतो, अशा व्यक्तींच्या मनात समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते ही भावना असणे अपेक्षित आहे. मात्र, ही भावना नसल्यास अशा व्यक्ती तसेच समाज भरकटू शकतो. त्यासाठी मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन संघटनेच्या दोन दिवसीय १८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलताना सांगितले की, सध्या जल, जंगल आणि जमीन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. भारतीय जैन संघटनेने यात काम करण्याची गरज आहे.देशातील समस्या सोडविण्यासाठी जैन समाजाने पुढाकार घेतला आहे.शैक्षणिक आणि सामाजिक कामात शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे मोठे काम आहे हे काम पुढे नेण्याची गरज आहे.

गावागावांत पाण्यासंदर्भात काम करण्याची आवश्यकता आहे.यासाठी आम्ही सध्या करत असलेले प्रयत्न केवळ सुरुवात आहे.समाज आणि देशासाठी प्रत्येकाने यासाठी योगदान देण्याची गरज आहे. भारतीय जैन संघटनेकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले व अनुभवही मिळाला.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना व पाणी फाउंडेशन एकत्र काम करत आहेत.राज्य सरकारही त्यात योगदान देईल अशी अपेक्षा सिने अभिनेता आमिर खान यांनी व्यक्त केली.

सध्या पाणी संवर्धन करण्याची गरज आहे कारण तीस वर्षांपूर्वी मी एका लेखातून भविष्यात पाणी विकले जाईल,असे लिहिले होते आज तशीच स्थिती आहे.मी पाणी संवर्धनाची मोहीम चालविली आहे ती तुम्ही पुढे नेण्याची गरज आहे. गावांतील तलावांचे खोलीकरण करून पुनर्भरण करणे आवश्यक आहे. संघटनेने देशातील १० जिल्ह्यांत अशी ३० हजार कामे केली आहेत.संघटनेने शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले आहे. शिक्षणात मूल्यवर्धन करत संघटनेच्या विचारांचा वारसा पुढे न्यायला हवा.शाश्वत विकासाच्या कामाला यानंतरच्या काळात पुढे नेण्याची गरज आहे, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी बोलताना देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत जैन समाजाचे योगदान मोठे आहे. समाज एकविचाराने राहिला. सर्वांनी एकत्रित आणि सातत्याने काम केले तर फार मोठे काम उभे राहते त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जैन समाज आहे.कोरोनाकाळात पुणे येथे सर्वसामान्यांसाठी जैन संघटनेने केलेले काम मोठे आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी केंद्रिय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ,लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि सकल जैन समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ.विजय दर्डा,भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा,अभिनेते आमिर खान, सत्यजित भटकळ,आमदार चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ,आमदार भीमराव तापकीर,आमदार हेमंत रासने,आमदार सर्वश्री सुनील कांबळे, योगेश टिळेकर, परिणय फुके, प्रशांत बंब, प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी,विठ्ठल मणियार,विजय भंडारी,राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी,राजेश जैन,डॉ. चैनराज जैन आदी उपस्थित होते.
