यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

चैत्री यात्रा कालावधीत नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

अतिक्रमण मोहिमेवर भर द्यावा

पंढरपूर/उमाका- चैत्र शुध्द एकादशी 08 एप्रिल 2025 ला असून यात्रा कालावधी दि. 2 ते 12 एप्रिल आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.भाविकांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यापुर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात. तसेच चैत्री यात्रेत कालावधीत चंद्रभागा नदीमध्ये कावडी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.येणाऱ्या भाविकांना चंद्रभागा नदी पात्रात पवित्र स्नान करता यावे यासाठी संबधित विभागाने चंद्रभागा नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घेवून नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीसाठी तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे,पंढरपूर मुख्याधिकारी प्रशांत जाधव,शहर पोलिस निरिक्षक विश्वजित घोडके, मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी.एस.भोळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, पंढरपुरात चैत्री यात्रा कालावधीत तीन ते चार लाख भाविक येतात.या यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत.मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. नदीपात्रात कोणतेही खाजगी वाहने जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करावे.

दर्शन रांगेतील भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी मंदिर समितीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे.चैत्री यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात असल्याने अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करावी. महावितरण विभागाने अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा करावा.प्रदक्षिणा मार्गावरील रोहित्रांना आवरण घालावे.आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत अशा सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.

यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे.स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पाणी,वीज,स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सांगितले.

या बैठकीत आषाढी यात्रेबाबतच्या नियोजनाचाही आढावा घेवून आवश्यक कामे तात्काळ सुरु करावीत अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top