औदुंबर आण्णा आणि शरद पवार यांच्याच विचाराच्या पाठीशी विठ्ठलचा सभासद हा कायम उभा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

विठ्ठल कारखान्याचा सभासद हा औदुंबर आण्णा आणि शरद पवार यांच्याच विचाराच्या पाठीशी कायम उभा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

रांझणी (भिमानगर) येथे विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/११/२०२४: महाविकास आघाडी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ रांझणी भिमानगर ता.माढा येथून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी खा.धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद हा कैलासवासी औदुंबर आण्णा पाटील आणि शरदचंद्र पवार यांच्या विचारांच्या पाठीशी कायम उभा राहिलेला आहे त्याच विचारांवर अभिजीत पाटील यांच्यासोबत देखील उभा राहील असा ठाम विश्वास आहे.लोकसभेला जेवढे लिड मला दिले आहे त्यापेक्षा डबल मतांनी अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले.

यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते- पाटील म्हणाले की,विजयदादा व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला.मात्र प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी त्यात आडफाटा आणण्याचे काम केल्याची टीका त्यांनी आमदार बबनराव शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. त्याचबरोबर अभिजीत पाटील यांना मोठ्या दादांनी आशीर्वाद दिला असल्याने त्यांचा विजय निश्चित असून तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले की,भीमा नदी पट्ट्यातील अनेक भागात केळी उत्पन्न जास्त असून यासाठी केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर ही केळी परदेशात निर्यात व्हावी यासाठीही पुरेपूर पाठपुरावा करणार असून ड्रायफूड निर्मिती प्रक्रियेसही प्राधान्य देणार आहे. यामुळे केळी, डाळिंब, द्राक्षे यांना भरघोस आणि उत्तम असा दर मिळेल. महाराष्ट्रातील सर्वात मोठे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असूनही पाण्याचे योग्य नियोजन या लोकप्रतिनिधींनी कधीच केले नसल्यामुळे हे धरण मायनसमध्ये जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर नदीवरील बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जाते. हे पाणी आपल्याला बंधाऱ्याची उंची वाढवल्यास वापरता येईल. याकरता योग्य नियोजनाची गरज असल्याचाही त्यांनी नमूद केले. माढा व पंढरपूर तालुक्यात रोजगार निर्मितीचा प्रश्न गंभीर असून यासाठी एमआयडीसी उभारण्याची गरज आहे. एमआयडीसीसाठी शेकडो एकर जमीन असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक लोकांना गंडवत आहेत. यामुळे हजारो लोकांचा रोजगार बुडत असून आपल्याला निवडून दिल्यास एक वर्षाच्या आत एमआयडीसीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच उजनी धरणावर पर्यटन स्थळ निर्माण करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा शब्दही त्यांनी दिला. उपसा सिंचन योजनेस कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवसेना (उबाठा) साईनाथ अभंगराव, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, भारत पाटील,बाळासाहेब पाटील,दिनेश जगदाळे,बाळासाहेब ढवळे,रावसाहेब देशमुख, बाबूतात्या सुरवसे, काकासाहेब पाटील, मधुकर देशमुख, पोपट तात्या अनपट, सागर पडगळ, औदुंबर महाडिक, गोविंद पवार, अरुण तोडकर, सौदागर जाधव, दत्ताभाऊ ढवळे, सुरज देशमुख, आकाश पाटील, प्रताप मिसाळ, माणिक अण्णा लांडे, प्रशांत पाटील, रविकांत पाटील, सचिन जगताप, अशोक बिचुकले, हरिभाऊ माने, सागर गिड्डे, दीपक खोचरे, ॲड.विजय गिड्डे, मधुकर ठोंबरे, राजाभाऊ भंगिरे, तुकाराम मस्के, सुवर्णा शिवपुरे, अनिता पवार, प्रमोदिनी लांडगे, विनिती कुलकर्णी, स्नेहा निंबाळकर, ऋतुजा सुर्वे, सुंदरताई माळी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top