राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांचे उद्गार
एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ
पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ सप्टेंबर २०२४: राजकारणात येतांना सरकार आणि प्रशासन समजावून घ्यावे , न्याय संस्थाचे ज्ञान असावे,शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवावे,ऐकण्याची सवय ठेवावी आणि लेजिलेटीव्ह टुल्ससारखेे गुण अंगीकारावे. तसेच समाजाचे कल्याण साधण्यासाठी राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात असे उदगार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’(एमपीजी) २० व्या बॅच च्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान व राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ.सी.पी.जोशी विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड होते.
एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ.के.गिरीसन,प्रा.डॉ.परिमल माया सुधाकर व श्रीधर पब्बीशेट्टी हे उपस्थित होते.
यावेळी नॅशनल लॅजिलेटिव्ह कॉन्फरन्सच्या कॉपी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.निलम गोर्हे म्हणाल्या,राजकारणात उतरल्यावर संसदीय कामकाज, वैयक्तिक, सामाजिक,आर्थिक आणि जीवनासंदर्भा तील अधिकार व आत्मविश्वास मिळतो हा धागा सर्वांना जोडणार आहे.मानवधिकार संदर्भातील माहिती घ्यावी. देशात आज ही जाती आणि वर्ण भेद आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी युवकांनी कार्य करावे. बदलत्या राजकारणामुळे खाजगी आणि सार्वजनिक जीवन राहिलेले नाही याचे भान ठेवावे.
कुलतार सिंह संधवान म्हणाले,सेवा परमोधर्म हे सूत्र लक्षात ठेऊन राजकारणाच्या मैदानात उतरावे.जनतेच्या सेवेतूनच सामाजिक समस्या सोडविता येतात.जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल. समाजावर राजकारणाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. या क्षेत्रात येतांना मानव सेवा निःस्वार्थ भावनेने करावी.विचार आणि तलवाराने इतिहास लिहिला जातो.या देशात विविध धर्मांचे लोक असल्याने धर्म विरोधक गोष्टींना कधीही वाव देऊ नका. देशातील संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे पास होतात त्यावर चर्चा विमर्श होत नाही. त्यामुळे असे आमदार आणि खासदार निर्माण व्हावे जे यावर बोलतील.

डॉ.सी.पी जोशी म्हणाल्या,देशात औद्योगिक क्रांतीनंतर सूचना क्रांती ही सर्वात मोठी होती.येथील उच्च शिक्षण जरी गुणवत्तापूर्ण असले तरी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणेची अपेक्षा आहे.विषम समाजाला एकत्रित आणण्यासाठी राजकारणी मंडळींचे काम आहे. त्याचनुसार प्रत्येक युवकांमधील स्कीलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाचे ज्यांनी नेतृत्व केले ते सर्व बाहेर देशातून उच्च शिक्षण घेऊन आले होते.त्यामुळे आता राजकारण क्षेत्रात योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.देशात शिक्षित युवा वोटर असल्यास शिक्षक राजकारणात येतील.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड म्हणाले,भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे पालन करून मानव सेवेला महत्व द्यावे. वसुधैव कुटुम्बकमची संकल्पना राबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतांना पं.नेहरू यांनी सांगितले होते की मी देशाचा सेवक आहे अशी भावना ठेऊन प्रत्येकाने कार्य करावे.

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे.देशाची वाढती लोकसंख्या संदर्भात कोणतीही पार्टी विचार करीत नाही.अशा वेळेस राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही.त्याचप्रमाणे देशातील कोणत्याही निवडणुकीच्या १ वर्षापूर्वी कोणतीही योजना घोषित करू नये. त्याच प्रमाणे हा पाठ्यक्रम देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेत सुरू करण्याची गरज आहे.
यावेळी डॉ.आर.एम.चिटणीस यांनी विचार मांडले
डॉ.परिमल माया सुधाकर यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.यावेळी विद्यार्थी संस्कृती ढोलमा आणि ध्रुव सावजी यांनी विचार मांडले.प्रा.डॉ.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.