उच्च न्यायालयाच्या आदेशाला एक महिना उलटूनही प्रशासन निष्क्रिय
दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन
तुळजापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री तुळजाभवानी मंदिरात घोटाळे करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने देऊन एक महिना उलटला आहे; मात्र अद्यापही प्रशासनाकडून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या निषेधार्थ आज श्री तुळजाभवानी मंदिरा बाहेरील मंदिराच्या प्रशासकीय कार्यालया समोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी घंटानाद आंदोलन केले.
यावेळी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे,पुजारी मंडळाचे सदस्य विजय भोसले,जनहित संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके, शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंखे,हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, अमित कदम, विनोद रसाळ, सर्वोत्तम जेवळीकर, संदीप बगडी, सुरेश नाईकवाडी, किरण लोंढे, सूरज लोंढे, श्रीमती पुनाताई होरडे,सौ.कल्पना क्षीरसागर यांसह मोठ्या संख्येने देवीभक्त उपस्थित होते.

वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक चौकशी समितीने लिलावदार,मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदी १६ जणांना दोषी ठरवले होते मात्र त्यांच्यावर अनेक वर्षे झाली, तरी कायदेशीर कारवाई होत नव्हती.तेव्हा ९ मे २०२४ या दिवशी उच्च न्यायालयाने तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मात्र त्याला एक महिना उलटला तरीही प्रशासन निष्क्रिय असून अद्यापपर्यंत दोषींवर गुन्हे नोंद झालेले नाहीत.या प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत या मागणीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे नोंद केले नाहीत तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करू तसेच राज्यभर तीव्र आंदोलन करू,असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी दिला आहे.