आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु
कोल्हापूर दि.14 (जिमाका) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सोडत (लॉटरी) दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी दि. 14 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कालावधी देण्यात येत आहे. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे अशा विद्यार्थ्यांची निवड यादी व पुढील फेरीसाठी प्रतिक्षा यादी RTE पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात आली आहे.

शहर स्तरावर महानगरपालिकेकडील व तालुका स्तरावर पंचायत समितीकडील पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांस प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करुन पालकांना परत करावे, तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. पालक काही कारणास्तव दिलेल्या तारखेस कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहू शकले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरीता पालकांनी विहीत मुदतीत पडताळणी समितीशी संपर्क साधावा.
पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांचा रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय यांची पडताळणी करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यां करीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी, जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशासाठी तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाहीत तर विहीत मुदतीत आरटीई पोर्टलवर Not Approach करावे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आरटीई पोर्टलवर करण्यात आली आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन संबंधित शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व या माहितीचा लाभ घ्यावा.
आरटीई 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याबाबतची सुचना शाळांनी प्रवेशद्वारावर लावायची आहे. विहीत मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, पालकांनी खोटी, चुकीची माहिती भरुन बालकाचा प्रवेश निश्चित केला असल्याचे निदर्शनास आल्यास बालकाचा आरटीई 25 टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. विहीत कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळेमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.
आरटीई अंतर्गत 25 टक्के आरक्षण मधून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
जन्माचे प्रमाणपत्र (सर्व घटकांना अनिवार्य)- ग्रामपंचायत/न.पा./ म.न.पा. यांचा दाखला/ रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल.
निवासी पुरावा (सर्व घटकांना अनिवार्य)
रेशनिंग कार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स / प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / वीज बिल / पाणी बिल / टेलिफोन बिल इ. यापैकी कोणतेही एकही कागदपत्रे नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा किमान 11 महिन्यांचा नोंदणीकृत भाडे करारनामा ग्राह्य धरण्यात येईल, भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असणे गरजेचे आहे.
सामाजिक वंचित घटक (SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC) यांच्यासाठी वडीलांचा / बालकाचा जातीचा दाखला / प्रमाणपत्र- उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसुल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा (वडीलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (1 लाख रु.पेक्षा कमी उत्पन्नाचा)
तहसिलदार यांच्याकडील प्रमाणपत्र / सॅलरी स्लिप / कंपनीचा किंवा मालकाचा दाखला (सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला) ग्राह्य धरण्यात येईल.
घटस्फोटीत अथवा न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे-
1) न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.
विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे
1) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.
एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे
आई किंवा वडिल यापैकी पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे
अनाथ बालकांबाबत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. इतर कागदपत्र उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे
जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
जिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
आधार कार्ड (विद्यार्थी व पालकांचे)
विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड किवा आधार क्रमांक मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य आहे. परंतु काही कारणांमुळे बालक, पालक आधार कार्ड सादर करु शकले नाही तर अशा प्रकरणांमध्ये बालकाचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून बालकास तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत पालकांनी बालकाचे आधारकार्ड शाळेकडे सादर न केल्यास बालकाचा आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल.
बालकाचे छायाचित्र- अर्ज करणा-या बालकाचे पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र इ. कागदपत्रांची आवश्यता आहे.