सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन
देशमुख व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य राहणार उपस्थित
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाजाचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार २२ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर येथील समन्वयक रवी मोहिते यांनी दिली.

या मोर्चास संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत.
याबाबत माहिती देण्यासाठी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या पत्रकार परिषदेस माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कुर्दूवाडीचे संजय टाणपे, संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर,किरण घाडगे,स्वराज पक्षाचे महादेव तळेकर,किरण भोसले,दिगंबर सुडके,विनोद लटके,महेश पवार,आकाश पवार,बंटी भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवी मोहिते यांनी सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्याच केली असल्याचा आरोप केला. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी केली.
दीपक वाडदेकर यांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी तसेच यातून कोणत्याही आरोपींची नावे वगळली जाऊ नयेत यासाठी आक्रोश मोर्चा आयोजित केल्याची माहिती दिली.
सदर मोर्चा बुधवार २२ रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे.या आक्रोश मोर्चा मध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेव पाटील आर्थिक महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर,दीपक केदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.