मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ
४ हजार २०० मेगावॅट विजेचे वहन शक्य
महापारेषणद्वारे अतिरिक्त वीजपुरवठ्याची हमी
मुंबई,दि.१७ : मुंबई शहर व उपनगराच्या वीजमागणीत सातत्याने वाढ होत असताना त्या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषण च्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १ चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून (महापारेषण) अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केले आहे. ५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत नुकतेच हे काम पूर्ण झाले.यामुळे वाहिनी क्र.१ आणि वाहिनी क्र.२ या दोन्ही वाहिन्या मिळून २०००मेगावॅट ऐवजी ४ हजार २०० मेगावॅट विजेचे वहन करणे आता शक्य होणार आहे.

या वाहिनीचे यापूर्वीच २७ कि.मी.चे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते.उर्वरित २३ कि.मी.चे काम महापारेषणने युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. या वाहिनीच्या कामात रेल्वे,हायवे व उच्च विद्युत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन तसेच ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यासारखी मोठी आव्हाने होती.परंतु या सर्व अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतीशीलता आणण्या साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून २३ कि.मी.चे वरील काम तातडीने पूर्ण केले.
या कामामुळे ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-१ च्या क्षमतेत आमुलाग्र बदल होऊन पूर्वीच्या १००० मेगावॅट ऐवजी २१०० मेगावॅटपर्यंत विजेचे वहन करणे शक्य होणार आहे.यापूर्वीही कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-२ च्या क्षमतेत वाढ झाल्याने दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावॅटऐवजी ४ हजार २०० मेगावॅट इतक्या विजेचे वहन करणे आता शक्य होणार आहे.