जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आ.अभिजीत पाटील
माढाचे आ.अभिजीत पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न
एमआयडीसी चा लवकरच प्रश्न मार्गी लागणार,माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात
नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासाठीच आमदार अभिजीत पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवली आहे.
माढा पंढरपूर विधानसभा मतदार संघातून विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी पाठविण्याचे काम निवडणुकीत मतदारांनी केले आहे.त्यामुळेच आमदार अभिजीत पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूदपणे आपल्या मतदार संघातील विकासासह राज्यातील मराठा, धनगर,लिंगायत,महादेव कोळी,मुस्लिम या विविध जातींच्या आरक्षणासंदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. आगामी २५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. परंतु या आंदोलनाच्या इशार्याकडे सरकारने गांभीर्याने पहिलेले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आ.अभिजीत पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. यामुळेच आ.अभिजीत पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचे काम खुद्द आ.अभिजीत पाटील यांनी केले आहे.यामुळेच मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आ.अभिजीत पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरु केल्याचे जाणवत आहे.
माढा मतदार संघातील माढा शहरामध्ये दहा दिवसांतून पिण्याचे पाणी मिळते.उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का ? असा गंभीर प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोंडविण्याबाबत मागणी केली आहे. सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.याकरिता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील एमआयडीसीला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही सांगितले.यासह विविध प्रश्नावर आ.अभिजीत पाटील यांनी आवाज उठवत आपण माढा मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेवून जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
एमएसपी वाढविण्यासाठी पाठपुरावा व्हावा
आपल्या महाराष्ट्र राज्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत.याच उद्योगावर राज्यातील मोठं आर्थिक गणित अवलंबून आहे.यासाठी हा साखर उद्योग चालविणे गरजेचे आहे.ऊस उत्पादक शेतकरी यांना लाभ होण्यासाठी साखरेचे भाव वाढविणे आवश्यक आहेत तरच उसाला भाव वाढ देणे शक्य असते.यासाठी आपल्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारला एमएसपी वाढविण्या साठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याची मागणी माढाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.
पहिल्या दिवशी सदनाच्या पायऱ्यांवर मी डोके टेकवले.कारण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना ज्या पवित्र भावना मनात येतात त्याच भावना त्यावेळी आल्या. इथे आपण कशासाठी आलो आहोत ही जाणीव कायम माझ्या मनात आहे..जी कदाचित आपल्या मनातदेखील राहील.. तुकोबांच्या शब्दात सांगायचे झाले तर…
उजळावया आलों वाटा ।
खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोलें बोल ।
धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥
मी भविष्याकडे जाणारे मार्ग उजळविण्यासाठी येथे आलो आहे.सत्य असत्य सांगून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये माझा वाटा उचलण्यासाठी आलो आहे.येथे बोलणारा प्रत्येक बोल विठ्ठलाच्या आणि मतदारसंघातील मायबाप जनतेच्या मनातील असेल अशी ग्वाही यावेळी मी देतो आणि सरकारनेही ती दिली पाहिजे असेही आमदार अभिजित पाटील म्हणाले.
