इव्हिएम विरोधात उठाव करत डमी इव्हिएम मशीन ला सलाईन लावत केले गावकर्यांनी प्रतिकात्मक आंदोलन

मारकडवाडीनंतर आता गादेगावकरांचा इव्हिएम विरोधात उठाव,डमी इव्हिएम मशीनला सलाईन लावुन गावकऱ्यांनी केले प्रतिकात्मक आंदोलन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएम द्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बर्‍याच लोकांमधून इव्हिएमबाबत शंका व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मत मोजणी व झालेले मतदान यांमध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोळ यांमुळे आता अनेक ठिकाणी या इव्हिएम मशीन्सविरोधात आवाज उठवला जात आहे.काल माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाने हस्तक्षेप करून व गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदाना पासून माघार जरूर घेतली. परंतु प्रशासनाने केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली आता याच्याच प्रतिक्रीया उमटत आहेत.

याचाच भाग म्हणुन आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील गावकऱ्यांनी व मतदारांनी एकत्र येत डमी इव्हिएम मशीन ला सलाईन लावत एकप्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केले.

यासंदर्भात बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वक्ते रणजित बागल म्हणाले,इव्हिएम मशीन्स बाबत सामान्य जनतेमध्ये अनेक शंका आहेत.या मशीन्स द्वारे येणार्या निकालाचा जनतेला भरवसा उरलेला नाही शिवाय राज्यात ठिकठिकाणी या मतदान प्रकियेबाबतील चुकीच्या आकडेमोडीने जनता आणखी संभ्रमात आहे,मशीन ही शेवटी मशीन्स असतात,त्याला मानव कशावरून ऑपरेट करू शकणार नाही, आणि जर जनतेने दिलेले मत त्याच उमेदवाराला जाते की नाही याबाबत जनतेला संशय निर्माण झाला आहे. या मशीन्स जर जनतेच्या निरसन करू शकत नसतील तर अशा मशीन्सलाच उपचाराची गरज आहे म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्वजण करत आहोत.

शेतकरी नेते समाधान फाटे यांनी देखील इव्हिएम बाबत शंका उपस्थित करताना सामान्य जनतेला आता इव्हिएम मशीन्स बाबत गॅरंटी उरलेली नाही.लोकं स्पष्टपणे इव्हिएम विरोधात बोलत आहेत तर न्याय व्यवस्था मात्र याबाबत शाश्वत तोडगा काढायला तयार नाही त्यामुळेच आता जनता देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.

संभाजी ब्रिगेडचे तालुकाप्रमुख बाळासाहेब बागल म्हणाले की,लोकांनी केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराला जाते की आणखी दुसर्‍या कोणाला जाते हे प्रश्न जर लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे,मशीन्स बाबत सामान्य जनतेत तीव्र नाराजी दिसुन येते. त्यामुळेच जनतेचा निवडणुक आयोग व मतदान प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही. म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले आहे.

इव्हिएम विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top