शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करावी- डॉ नीलम गोऱ्हे
पुणे / डॉ अंकिता शहा/ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे येथील नुकतेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या बस मधील ड्रायव्हर ने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.या निंदनीय घटनेची गंभीर दखल डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतली व परिवहन आयुक्त श्री भिमनावर यांना लेखी सूचना निवेदनाद्वारे दिल्या आहेत.

यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करिता विनियम) नियम २०११ तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन निर्णय २१/०८/२०२४ मधील शाळा मधील विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयी उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत खालील सूचना दिल्या आहेत –
१) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी वारंवार करावी
२) या वाहनावरील ड्रायव्हर व इतर मदतनीस यांचे चरित्र तपासणी पोलीस विभागामार्फत करावे.
३) प्रत्येक वाहनांमध्ये महिला मदतनीस ठेवावी
४) वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत.
५) वाहनाचा वेग मर्यादित असावा
६) वाहन पूर्णतः तंदुरुस्त असावे
७) शाळेतील प्राचार्य/ मुख्याध्यापक यांचे समोर वाहन चालक व सहायक यांना सूचना द्याव्यात
८) वाहन चालकांची शारीरिक व मानसिक चाचणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करावी तसेच यामध्ये वारंवार वाहनांची तपासणी अनिवार्य करावी असे ही स्पष्ट केले आहे. यानंतर राज्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अनेकवेळा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये विद्यार्थी अक्षरशः कोंबलेले असतात.पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अथवा त्या विद्यार्थ्याला त्रास दिला जातो त्यामुळे पालक तक्रार दाखल करण्यासाठी तयार नसतात.ही वाहने वेगाने चालवली जातात.त्यासाठी त्या वाहनांना वेग नियंत्रित होण्यासाठी लॉक टाकणे गरजेचे आहे आणि त्या वाहनांना कॅमेरे ही बसवणे सक्तीचे करावे जेणेकरून एखादी दुर्घटना घडली तर लक्षात येईल.याची वारंवार तपासणी केली जाणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे पैसा टाकून काहीही केले जाते.