उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४-भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 20000 क्यूसेक्स ने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.

तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.